Monday, 9 October 2017

🌼🌼सप्तपदी भाग क्र.6 🌼🌼

              सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन सप्तपदी या लेखमालेत हे सहावे पुष्प गुंफत आहे.गेल्या पाच भागांना आपण जो प्रतिसाद दिलात त्या बद्दल मी आपला कृतज्ञ आहे. महर्षि कण्वांनी शंकतुलेला विवाह संस्कारापूर्वी एक उपदेश केला होता तो पाहु मग आजच्या विषयाला आरंभ करु. शुश्रूषस्व गुरुन् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने । पत्युर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गम्:।। भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी । यान्तेवं गृहिणीपदं युवतयो:वामा:कुलस्याधय:।। महर्षि कण्व शकुंतले ला "गृहिणी "या पदाची व्याख्या सांगताना फार उत्तम उपदेश करते झाले.हे शकुंतले तु विवाहानंतर पतिगृहि गेल्यानंतर गुरुजन, जेष्ठ मंडऴींची उत्तम सेवा कर.तुझ्या समतुल्य वयाच्या स्त्रियांशी  "सखी " प्रमाणे मैत्री ठेव.मैत्रीच्या नात्यात ईर्ष्या, कटुता धरु  नकोस. पती सेवा करताना प्रेम आपुलकी चे नाते सदैव राहुदे.काहि प्रसंगात तुझे व पतीेचे तात्विक मतभेद झाले तरी क्रुध्द होवुन विपरीत वर्तन करु नकोस. घरातले सेवक (नोकर) मंडऴींशी अत्यधिक उदारभाव ठेव. त्यांचाशी सौजन्यपूर्ण व्यवहार कर. आपल्या उत्तम भाग्याचा (श्रीमंतीचा) अभिमान अहंकार मनी बाऴगु नकोस. अशा प्रकारे वर्तन ज्या स्त्रिया करतात त्याच "गृहिणी "पदाला योग्य ठरतात.  एका वैदिक विद्वान ऋषिंनी आपल्या मुलीला दिलेली हि कौटुंबिक जवाबदारीची जाणीव आहे.आर्य सनातन वैदिक धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे.प्रत्येक संस्काराला एक उपदेश व नैतिकतेची जाणीव करुन दिलेली आहे हाच धागा पुढे पकडुन आज सहावे पद काय जबाबदारी देते हे पाहु. ऋतुभ्य: षट्पदी भव。असा मंत्र अाहे. तु सहा पावले माझ्या सोबत चाललीस तु मला सर्व ऋतुत प्राप्त होणारे भोग देणारी हो. शब्दश:अर्थ फार सोपा सहज आहे.परंतु गुढार्थ गंभीर आहे.आपल्या कडे षड्ऋतु (सहा ऋतु) हे शास्त्रकारांनी  दिले आहेत.ग्रीष्म, हेमंत, शिशिर, वसंत, शरद, वर्षा अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येक ऋतुचे एक वैशिष्ट आहे. ग्रीष्म हा ऋतु उन्हाचे चटके देतो. शरद हा ऋतु चांदण्यांचा अनुभव देतो. वर्षा हा ऋतु पावसाचा आनंद व सृष्टित आल्हाद देतो. वसंत हा ऋतु "बहर "देतो. शिशिरात पानगऴ होते. या सर्व ऋतुत निसर्गात बदल होत राहतो. आपले आयुष्य हे तसेच अाहे.कधीतरी "वसंताचा बहराचा काऴ "असतो. म्हणजे आपल्या आयुष्यात प्रगतीचा काळ असतो. काहिवेऴा" शिशिराची पानगऴ हि होते "काहि वेऴा थोडि संकटे येतात खडतर काऴ आयुष्यात येतो. "ग्रीष्माचे चटके " हि भोगावे लागतात. (परीस्थितीमुऴे) शरदाच्या चांदण्याची शीतलता हि अनुभवता येते. थोडक्यात सांगायचे तर अायुष्यात सुख दु:ख, जय पराजय, लाभ हानी, चढ उतार सर्व घटना येत असतात.भरपुर संपत्ती येते कधी तरी गरीबी पण येते.तेव्हा  माझ्या प्रिय सखी तु सर्व काऴात "समान बुध्दिने "वाग.धन असताना "उन्मत्त पणाने मातु " नको व गरीबी आली तरी "गृहच्छिद्र उघडि करु नकोस " आपण उभयता या सर्व  ऋतुत परस्परांवर विश्वास ठेवुन मार्गक्रमण करुया.पैसा भरपुर आहे म्हणुन रोज "दिवाऴी " नको.व पैसा नाहि म्हणुन "शिमगा "नको. कण्व ऋषिंनी हेच शकंतुलेला समजवले हाच उपदेश आपल्या आयुष्यात आचरण केलात तर कितीहि संकटे येवुदेत दांपत्य त्यातुन सहज तरुन जाईल. धन या शब्दाची एक सोपी व्याख्या एका सुभाषितात केलीय. विदेशेषु धनं विद्या व्यसनेषु धनं मति:। परलोके धनं धर्म: शीलं सर्वत्र वै धनम्।। विदेशात "धन "हि विद्या आहे. व्यसनात किंवा संकटात बुध्दि हेच धन परलोकात "धर्माचरण "हेच धन शील मात्र सर्वत्र धनच आहे. तेव्हा माता भगिनींनो आपण कितीहि संकटे आली तरी न घाबरता वरील उपदेश मनाशी जतन करावा.पैसा हेच "धन" न जाणता विद्या, बुध्दि, धर्माचरण हेच धन मानुन आचरण करावे. शील मात्र प्राणाहुन जपावे प्रलोभनांना बऴी पडु नये.हि विनंती.तरच ऋतुभ्य:षट्पदी भव हे सार्थकी होईल. तुर्त लेखन मर्यादा. वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले 9404170656 (वरील लेख लेखकाच्या नावागावा सहित अन्यत्र देवु शकता याने तात्विक समाधान लाभते व चौर्यकर्म पातक लागत नाहि) 

No comments:

Post a Comment