Thursday, 5 October 2017

   🌼🌼सप्तपदी भाग 2 🌼🌼

               सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन सप्तपदी या लेखमालेतील दुसरे पुष्प गुंफत आहे. प्रकृति व पुरुष या दोघांच्या संयोगाने हे विश्व निर्माण झाले. शिवशक्ति हि त्याचेच रुप आहे.विवाह संस्कार हा देखील शिवशक्तिचे मिलन आहे .विवाह हा संस्कार केवऴ "वासनाशमन करण्याकरता नाहि " हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या गोष्टिचा चुकीचा हेतु डोक्यात शिरल्यानंतर होणारी कृती हि "अविचारीच "असते.उदा.एखाद्या व्यक्तीला आत्मसंरक्षणाकरता  शस्त्र दिले असता त्या व्यक्तीला वारंवार या उद्देशाची जाणीव करुन द्यावी लागते.  (या शस्त्राचा उपयोग दरोडे टाकणे, खून करणे या करता होता नये हे कठोर शब्दात समजवुन सांगावे लागते) तसच विवाहा बद्दल देखील नवदांपत्याना नीट समजवुन देणे गरजेचे आहे. (काम भावना हा एक महत्वाचा भाग आहेच परंतु केवऴ कामविषय शमन म्हणजेच विवाह नव्हे) तर विवाहानंतर घरातली सर्व जवाबदारी नवदांपत्याने स्विकारणे व सर्वांना सोबत घेवुन मार्गक्रमण करणे हाच गृहस्थाश्रम आहे. विवाह हा "अद्वैताचा "सोहऴा आहे.द्वैताकडुन (वधु व वर या दोन भिन्नांना एकत्र आणणे व शिवशक्तिचे मीलन घडवणे या द्वैतांचे अभिन्न अद्वैत करणे हेच विवाह संस्काराचे महत्व आहे) नेमके आज हेच होताना दिसत नाहिये त्यामुऴे मला "स्पेस"हवी या नावाखाली जवाबदारी झटकणे सुरु आहे. या जवाबदारीची जाणीव "सप्तपदी "करुन देते.काल आपण पहिल्या पावलाचा अर्थ पाहिला आज.दुसरा मंत्र व दुसरे पाउल काय जवाबदारी देते हे सांगतो. ऊर्जे द्विपदी भव。असा मंत्र आहे. वधुकडे वराने केलेली अपेक्षा हि फार  महत्वाची आहे. तु मला ऊर्जा देणारी हो. ऊर्जा म्हणजे शक्ति प्रेरणा. बरेचदा काहि आर्थिक, कौटुंबिक, व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी काहि संकटे येतात काहिवेऴा मानसीक दडपण येते त्यावेऴी "पती "ला मानसीक, बौध्दिक धैर्य देणारी त्याला संकटाशी लढण्याकरता प्रेरणा देणारी हो.अशी  कामना सप्तपदीत दुसर्या पावलाच्या ठिकाणी केली आहे. भारतवर्षात अशी अनेक उदारणे आहेत ज्यात पत्नीने  आपल्या पतीला वेऴप्रसंगी योग्य उपदेश केला आहे .संत तुलसीदास हे पत्नीच्या उपदेशाने भगवद्भक्ति कडे वऴले हि कथा आपण जाणताच. महाकवी कालीदासाला पत्नीने केलेल्या  तीक्ष्ण उपदेशामुऴेच कालीदास हे श्रेष्ठ झाले. दशरथांना तर कैकयीने युध्दभूमीवर मदत केलेली होती. अनेक उद्योगपती हे गरीबीतुन वर आले आहेत व त्यांना "ऊर्जा "देण्यामागे( शक्ति व धैर्य देण्यात) त्यांच्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. अशी अनेक उदारणे देता येतील विस्तारभयास्तव देत नाहि मनुस्मृतित एक फार उत्तम श्लोक दिलाय. संतुष्टो भार्यया भर्ता भर्ता भार्या तथैवच । यस्मिन्नेव कुलेनित्यं कल्याणं तत्र वै ध्रुवम्।। (अ.3.60)ज्या कुऴात पती पत्नीला संतुष्ट ठेवतो .पत्नी पतीला संतुष्ट ठेवते त्या कुळाचा (घराण्याचा) नेहमी उत्कर्षच होतो. आपल्या संस्कृतीत नेहमी "सकारात्मक "विचारसरणी आपण अंगिकारावी असा अलिखीत नियम आहे उदा.आपण घरात बटाटे संपलेत /तांदुऴ संपले असे म्हणत नाहि तर बटाटे /तांदुऴ आणायला हवे असे म्हणतो. बांगडिला तडा गेला तर "बांगडि फुटली "असे न म्हणता बांगड्या वाढवल्या असे म्हणतो. म्हणजेच नेहमी सकारात्मक ऊर्जा हि घरात असली कि कोणतेहि संकट आले तरी त्यावर मात करता येते. त्यामुऴे संकटसमयी धैर्य न सोडता पतीला योग्य मार्गदर्शन व सन्मार्गावर चालण्याकरता वेऴप्रसंगी कठोर उपदेश करणे व पतीला "ऊर्जा "देणे हा दुसर्या पदाचा हितोपदेश आहे. पतीने देखील तु मला "उपदेश करणारी कोण शहाणी? "  असे फालतु प्रश्न विचारु नयेत.तुलसीदास व कालीदासांचे चरीत्र वाचावे मग पत्नीचे महत्व व हितोपदेश याचे गांभीर्य कऴेल.दुर्गा सप्तशतीत तर देवांचे सैन्य पराजीत होतय हे पाहुन देवतांच्या पत्नींनी असुरांशी युध्द केलय (वाराहि, माहेश्वरी, वैष्णवी, कौबेरी अशा अनेक देवपत्नी रणागंणात उतरल्या होत्या व युध्दात जय प्राप्त केला होता हे विसरु नये) वेऴप्रसंगी स्वत:सर्व अलंकार गहाण टाकुन (मंगऴसुत्रासहित) नवर्याला आजारपणातुन वाचवलेल्या महिलांची उदारणे समोर आहेत.बाबा आमटें सारख्या कर्मयोग्याला पत्नीचीच साथ मिऴाल्याने आज "आनंदवन"सारखी संस्था उभी आहे.तेव्हा या ऊर्जेला कमी न लेखता आपणहि हि ऊर्जा प्राप्त करुया हि कामना. तुर्त लेखन मर्यादा. वे.भूषण दिगंबर जोशी वेंगु्र्ले 9404170656  (वरील लेख लेखकाच्या नावागावा सहित अन्य समुहावर देउ शकता याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाहि) 

No comments:

Post a Comment