—
शनी हे ज्योतिष शास्त्रातले नेमके काय प्रकरण आहे हे पाहण्यासाठी शनीची ज्योतिषशास्त्रात विशद केलेली भूमिका समजून घ्यावी लागते. प्रत्येक ग्रहाच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू अभ्यासण्याची पद्धत ज्योतिषशास्त्रात आहे. त्या दृष्टीने पाहिले तर शनी हा एका बाजूला (म्हणजे पत्रिकेत शुभ स्थितीत असेल तर) कष्टाळू आहे, कामात व्यग्र राहणारा, चिकाटी असलेला, तपस्वी, विचारी, संयमी, दृढनिश्चयी, काहीसा विरक्त, अंगमेहनतीला तयार असणारा, काटकसरी, कर्तव्यकठोर, न्यायप्रवीण आणि प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकवणारा असा ग्रह मानला जातो. त्याची दुसरी बाजू म्हणजे (शनी पत्रिकेत बिघडलेला असेल) अशा व्यक्ती आळशी असतात, अनीतीने वागणाऱ्या असतात. खोटारडेपणा, पापी, क्रूर, निष्ठुर, दीर्घसूत्री, खुनशी, कंजूष आणि अस्वच्छ असतात. याचे प्रत्यक्ष मोजमाप करताना पत्रिकेत शनी अमुक एका राशीत आहे असे बघून न करता पत्रिकेतील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. तो जेवढा सखोल व सर्व घटक विचारात घेऊन करू तेवढे शनीचेच काय पण पत्रिकेचेच एकूण मूल्यमापन योग्य असे होते. आता हा झाला ज्योतिषशास्त्रातला एक तांत्रिक भाग.
शनीची शिकवण
भूतकाळात जे घडून गेले आहे त्यावर जास्त विचार करत बसू नका. भविष्यकाळ अजून पुढे येणार आहे. आज आत्ता कोणते कर्म करणार आहे यावर तुमचे आगामी काळातले सुख-दुख अवलंबून आहे. ही वर्तमानात जगण्याची कला शिकवणारा हा ग्रह आहे. भोगा आणि मुक्त व्हा हा त्याचा संदेश आहे. आयुष्याचा जबाबदारीने स्वीकार करून ते पार पाडण्याचे तंत्र शनी शिकवत असतो. जे जे अटळ आहे, टाळू शकणार नाही ते आहे तसे स्वीकारा. जे टाळू शकता ते टाळण्यासाठी प्रयत्न करा, हे शनीचे सांगणे असते. शनीचे शिकवणेसुद्धा अजब असते. वास्तविक ज्योतिषशास्त्रात गुरू हाही एक शिक्षक व गुरूही आहे. बृहस्पती म्हणजे गुरूची शिकवणी ही फळा खडू घेऊन हे वर्गात शिकवणाऱ्या गुरूसारखी असते. मात्र शनीची शिकवणी ही वास्तव असते. रस्त्याने चाला. खड्डा दिसतोय. एकदा सांगणार, दुसऱ्यांदा नाही सांगणार. नाही लक्ष दिले तर त्या खड्डय़ात पडा. हातापायाला लागले की, आता कसे कळले, असे छद्मीपणे म्हणत तो कृतीतून शिकवतो.
साडेसाती म्हणजे काय?
आपला जन्म चंद्र ज्या राशीत असतो त्याला आपली जन्मराशी असे म्हणतात. बारा राशींपकी आपली कोणतीही राशी असू शकते. भारतीय लोकांना जन्मराशी सहसा माहीत असते. या राशीच्या अगोदरच्या राशीत तो आला की साडेसाती सुरू होते. आपल्या जन्मराशीत आला असता साडेसातीचा मध्य असतो आणि त्याच्या पुढच्या राशीत आहे तोपर्यंत हा तिसरा टप्पा असतो आणि अशी ही साडेसाती चालू असते. शनी एका राशीत साधारणपणे अडीच र्वष असतो. म्हणजे आपल्या राशीच्या अगोदरच्या राशीतली अडीच वष्रे ही पहिली अडीचकी. आपल्या राशीतला अडीच वर्षांचा काळ ती मधली अडीचकी आणि आपल्या पुढच्या राशीत असलेला शनीचा अडीच वर्षांचा काळ ही तिसरी अडीचकी. अशा तीन अडीचकी मिळून साडेसात र्वष अशी ही साडेसाती असते. सर्वसाधारण तीन साडेसातींचा काळ मनुष्याला अनुभवावा लागतो. आणि शतायुषी असणाऱ्यांना कदाचित चार साडेसातीही पाहता येते.
साडेसातीत एवढे जपा…
साडेसातीमधे सगळेच काही वाईट होत असते हा एक फार मोठा गरसमज सर्वसामान्यांमध्ये आहे. साडेसातीमध्ये सगळ्यात जास्त काळजी कशाची घ्यायची त्याचाच उलगडा मी आधी करतो. शनी हा कर्मयोगी ग्रह आहे. त्याला शुष्क ग्रह असे म्हणतात. ना तो तुमच्या सुखाला भुलणार आहे ना दु:खामुळे तो स्वत: दु:खी होणार आहे. शनीला न आवडणारा एकमेव प्रकार म्हणजे माणसाचा अहंकार. वास्तविक अहंकार ही गोष्ट एरवीसुद्धा तापदायक असतेच असते. एखादी गोष्ट मी केली असे अभिमानाने सांगणे आणि ती मी केली असे सतत सांगून दुसऱ्याला कमी लेखणे हा अहंकाराचा फणकारा एरवीही आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. तो साडेसातीला जास्त अधोगतीला नेतो. कुठेही तुम्ही ‘मी केलंय, मीच असं केलंय, मी बघून घेईल, माझा मी स्वतंत्र आहे’ असे मी आणि माझा करत बसला की शनी त्याला साडेसातीमध्ये योग्य ती जागा दाखवतो. त्यामुळे साडेसातीमध्ये कोणतेही प्रश्न थेट प्रतिष्ठेपर्यंत नेऊ नयेत. अहंकाराचा फणकारा मनात सारखा येऊ देऊ नये आणि जगात आपल्यापेक्षा कितीतरी चांगली आणि मोठी माणसे आहेत यावर विश्वास ठेवावा. दुसऱ्याला सन्मान दिला तरच आपल्यालाही मान मिळतो, हे लक्षात ठेवावे. एवढी गोष्ट साध्य केली तरी साडेसातीचा त्रास हा खूपच कमी होऊन जातो. त्यामुळे साडेसाडीत सगळ्यात जास्त काय जपायचे तर आपला हा इगो – अहंकार. अन्यथा आपली खरी पायरी व खरी ओळख दाखवून द्यायला शनी बसलेलाच असतो.
साडेसाती म्हणजे खूप चांगलेही!
साडेसातीमध्ये सगळेच काही वाईट होते अशी एक धारणा अनेकांची असते. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात खूपच चांगल्या अशा घटना किती असतात? फक्त आठ – दहा. उदा. आपले शिक्षण पूर्ण होणे, विवाह होणे, चांगली नोकरी लागणे, बढती, संतती, परदेशगमन, एखादा मोठा धनलाभ, वास्तू, एखाद मोठा सन्मान इ. इ. वास्तविक आयुष्यात आपल्यासाठी सत्तरीत म्हणजे उतारवयाच्या एका टप्प्यावर येऊन मागे वळून पाहिले तर आपल्या नक्की लक्षात येईल की अत्यंत चांगल्या अशा घटनांपकी जास्तीत जास्त घटना या साडेसातीत झालेल्या असतात. साठी पार केलेल्या कोणीही सिंहावलोकन केले तर ही गोष्ट लक्षात येईल. म्हणजे साडेसातीमध्ये वाईटच घडते असे अजिबात नाही. किंबहुना आयुष्यातल्या अती चांगल्या घटनाही साडेसातीत घडू शकतात यावर विश्वास ठेवा.
आपले कोण व परके कोण?
साडेसातीमध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला कळून चुकते. खरीच आपली माणसे कोण आणि परकी कोण हे या काळात कळते. एरवी आपण ज्यांना मदत केली, ज्यांच्यासाठी आपला वेळ दिला, झुरत राहिलो, त्याच्या कल्याणासाठी झटत राहिलो ती माणसे या साडेसातीच्या काळात येतीलच असे नाही. आपल्या मताचा आदर ते राखतीलच असे नाही. त्यामुळे हेच का ते, असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे मनस्ताप होतो. हा मनस्ताप एवढाच भाग खरे तर साडेसातीत असतो. पण कदाचित ज्याला आपण झिडकारले किंवा कमी महत्त्व दिले अशी एखादी व्यक्ती आपल्याला येऊन मदत करते. म्हणजे आपले नातेवाईक असो, परिचित असो वा मित्रपरिवार, खरेच आपले कोण आहेत हे दाखवून देणारी साडेसाती असते. स्वत:ची व सर्व सगेसोयऱ्यांची खरी ओळख शनी करून देतो. त्यामुळे साडेसातीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो.
खरा त्रास याचाच…
खरे तर साडेसातीमध्ये फार काही अजब अघटित घडते किंवा संकटांची मालिका येते ही काल्पनिक भीतीच आपल्याला अस्वस्थ करत असते. साडेसाती असणाऱ्यांच्या मनात भयगंड निर्माण होतो. न्यूनगंडही निर्माण होतो. साडेसातीमध्ये आता आपले काही खरे नाही, अशा मानसिक भीतीमुळे येणारे मानसिक दौर्बल्य आपल्याला त्रास देत असते. मनस्ताप होतो. प्रत्यक्ष झाला नाही, कसल्याही दुर्घटना घडल्या नाहीत तरी या काल्पनिक भीतीचे सावट मनावर असते. मुख्यत: ते दूर ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
कोणता टप्पा त्रासदायक?
त्यातल्या त्यात प्रत्येक राशीला या तीन टप्प्यांपकी कोणता टप्पा त्रासदायक जातो हे आपण पुढे पाहू. मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक या राशिगटांना साडेसातीचा त्रास त्यातल्या त्यात जास्त होत असतो, कारण मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या राशी असून आक्रमक आणि तापट असतात. त्यामुळेच त्यांच्याकडे अहंकाराचा भागही तेवढाच असतो. सिंह राशीही अशीच प्रचंड अहंकारी असल्याने त्यांचीही तीच गत असते. त्यातही सिंह राशी ही शनीचा शत्रू ग्रह म्हणून ओळखला जाणाऱ्या रवीची राशी असल्याने सिंह राशिगटांनाही साडेसातीचा त्रास जास्त होतो. त्या खालोखाल त्रास होतो तो कर्क राशिगटाला. कारण कर्क राशीचा अधिपती चंद्र हाही शनीचा शत्रू ग्रह असल्याने आणि चंद्र हा मनाचा कारक असल्याने मानसिक त्रास हा कर्केला जास्त होत असतो.
अडीच वर्षांचे तीन टप्पे म्हणून साडेसात वष्रे अशी साडेसाती हे आपण सुरुवातीला पाहिले. आपल्या जन्मराशीच्या अगोदरच्या राशीत शनी आला की साडेसाती सुरू होते तो पहिला टप्पा असतो. आपल्या राशीमध्ये शनी असणे हा मधला टप्पा असतो आणि आपल्या पुढच्या राशीतून शनी भ्रमण करत असतो तो तिसरा टप्पा असतो.
यापुढे आपण प्रत्येक राशीला कोणता टप्पा त्रासदायक ठरतो हे पाहू. मेष राशीला मधला टप्पा, वृषभ राशीला पहिला टप्पा, मिथुन राशीला तिसरा टप्पा, कर्क राशीला मधला आणि तिसरा टप्पा, सिंह राशीला पहिला आणि मधला टप्पा, कन्या राशीला पहिला टप्पा, तूळ राशीला तिसरा टप्पा, वृश्चिक राशीला मधला टप्पा, धनू राशीला पहिला टप्पा आणि मीन राशीला तिसरा टप्पा त्यातल्या त्यात त्रासदायक ठरतो. मकर आणि कुंभ या शनीच्या स्वत:च्या राशी असल्यामुळे त्या राशिगटांना तेवढा त्रास साडेसातीचा होत नाही आणि त्रासही आधी मानसिकच असतो. ते गृहीत धरून पुढे गेल्यास शारीरिक वा अन्य त्रास होण्याच्या शक्यता खूपच कमी राहतात.
त्यातही चंद्र जेवढय़ा अंशात असेल, त्या अंशातून होणारे शनीचे भ्रमण हे त्यातल्या त्यात तापदायक ठरू शकते ही गोष्ट मात्र एखाद्या ज्योतिषाकडून समजून घेणे प्रत्येकाच्या हिताचे असते. त्यातल्या त्यात या चंद्रावरून होणारे शनीचे भ्रमण काहीसे तापदायक असल्याने ते तीन-चार महिने जास्त सतर्क राहावे एवढाच काय तो साडेसातीतला खरा भाग.
ज्यांच्या पत्रिकेत शनी आणि मंगळाचे कुयोग असतात किंवा अन्य ग्रहस्थिती बिघडलेली असते, अशांना साडेसातीमध्ये थोडा जास्तीचा त्रास होऊ शकतो, अन्यथा शनी आणि साडेसाती म्हणजे खरे तर प्रगतीचा काळ असतो. जर आपण जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागलेल्या अवस्थेत राहायची कला आत्मसात केली आणि मीपणा जरा बाजूला ठेवण्याचे कौशल्य आत्मसात केले तर साडेसातीतल्या चांगल्या घटनांचेही साक्षीदार आपण होऊ शकता.
काही व्यवहार्य सूचना-
२६ जानेवारीपासून ज्या तीन राशिगटांना साडेसाती असणार आहे, त्यांच्यासाठी काही व्यवहार्य सूचना. तूळ राशीची साडेसाती सध्या संपली असून त्यांनी बिनधास्त व्हायला काही हरकत नाही.
वृश्चिक राशीसाठी साडेसातीचे अंतिम पर्व सुरू झाले आहे. हा धनू राशीतला शनी कोदंडधारी असा समजला जातो. म्हणजे प्रभू रामचंद्रांना ती उपमा दिली जाते की जे सत्त्वशील आहेत, सत्यशील आहेत, पराक्रमी आहेत आणि तरीही नम्र आहेत. असा शनी कोणाला त्रास देत नाही. त्यामुळे धनू राशीतला शनी फारसा कोणाला अतित्रासदायक ठरेल अशी शक्यता नाही. वृश्चिक राशीसुद्धा या कमी त्रासाच्या छायेत येणार आहेत. आत्तापर्यंत आपले भोगून झाले आहे ते पुरेसे झाले आहे असे समजा. त्यातून सुटका होत होत बऱ्याच अंशी प्रगतीकडेही आपली वाटचाल होत राहील. त्यातल्या त्यात सतत कार्यमग्न राहा. कर्तव्यात कमी पडू नका. कमीत कमी बोला. काटकसरीने वागा. गृहसौख्य सांभाळून वागा. नोकरी-व्यवसायात फार मोठा धोका पत्करताना काही तज्ज्ञांचा सल्ला हाताशी ठेवा. आरोग्याची काळजी अजून तुम्हाला घ्यावी लागणार आहे हे विसरू नका. अर्थात, वृश्चिक राशिगटांनी गतं न शोच्चम् अशा अर्थाने जे होऊन गेले त्याच्यावर विचार न करता येणाऱ्या परिस्थितीतून चांगले काढण्यासाठी अवश्य तयार राहा.
आगामी सुमारे अडीच वष्रे धनू राशीतच शनीचे वास्तव्य राहणार आहे. आपला चंद्र ज्या अंशात असेल, त्या अंशातून होणारे शनीचे भ्रमण हे तीन-चार महिने तेवढे मनस्ताप देणारे असते. आपली म्हणवणारी माणसेसुद्धा आपल्या मनासारखे वागत नाहीत. आपलेही निर्णय चुकतात. त्या दृष्टीने तेवढी सतर्कता ठेवा. त्या काळात काहीसे नराश्य येते. मानसिक चिंता भेडसावतात. जे विवाहेच्छू आहेत त्यांचा विवाह लांबणीवर पडू शकतो. शांत चित्ताने, चिकाटीने आपल्या सकारात्मक वृत्तीवर भर देऊन आणि नम्रपणा अंगीकारून आपल्यालाही या साडेसातीचा त्रास जवळजवळ नाहीसा करता येईल एवढे नक्की.
मकर राशीची साडेसाती नुकतीच सुरू होत आहे. शनीचे धनू राशीतले भ्रमण हे आपल्याला परदेशगमनाच्या किंवा लांबच्या प्रवासाच्या संधी आणून देईल. आपली धार्मिकवृत्ती वाढेल. कार्यमग्नता वाढेल. आपला मूळचा काटकसरीचा आणि दूरदृष्टीचा स्वभाव आपल्याला उपयुक्त ठरेल. मानपान सहन करणे हे आपल्याला सहजच जमते. त्यामुळे कोणावरही रागरुसवा न काढता नम्रपणा घेऊन आपण ही अडीच वष्रे सहज पार करू शकाल, नव्हे प्रगतीच्या वाटेवरही जाऊ शकाल.
एकंदरीत काय तर शनी हा साडेसातीत केवळ त्रास देत नसून चांगल्याही अनेक गोष्टी घडवून आणतो. एरवीही साडेसातीशिवाय आपल्या आयुष्यात काही वाईट घटना घडत असतात. त्यामुळे केवळ साडेसातीत वाईट होते ही कल्पना मनातून काढून टाका. अहंकार बाजूला ठेवा. आपल्याला समोर आलेले काम जबाबदारीने पार पाडण्यावर भर द्या आणि कोणालाही न दुखावता वाटचाल करा. साडेसातीतही शनी आपली मोठी प्रगतीच करेल.
माझे मित्र डॉ. धुंडिराज पाठक यांचा सौजन्याने (वरील लेख मी लिहिलेला नाही) –