💕🌸 *
◆◆◆◆ विवाह संस्कार ◆◆◆◆
माणसाच्या आयुष्यात 16 संस्काराचे महत्व आहे. जन्मा पासून ते अंत्येष्टी (मृत्यू) पर्यन्त 16 संस्कार हिंदू धर्मात संगितले आहेत. त्यात सगळ्यांच्या आयुष्यात येणारा अत्यंत महवाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार..!
प्रत्येकाची इच्छा असते की आपले विवाहाचे विधी मात्र शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे... परंतु त्यात नक्की कोणते विधि केले जातात का केले जातात मुळात विवाह संस्कार म्हणजे काय? हा संस्कार का केला जातो? याची माहिती खुप लोकांना नसते. विवाह संस्कार हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा संस्कार. विवाहात केल्या जाणा-या विधींबद्दल हल्ली फार कमी लोकांना माहिती असते.
विवाह या शब्दाची व्युत्पत्ती वि + वह् अशी आहे. ठराविक मार्गाचे जीवन, कुळ, समाज, वाहून नेणे हा त्याचा अर्थ आहे, आणि संस्कार म्हणजे कोणत्याही वस्तूचे आपल्या इच्छेप्रमाणे रुपांतर करून घेणे. हिंदू विवाहपद्धतीत लग्न हा करार नसून एक संस्कार आहे.
विवाह विधी मध्ये प्रामुख्याने वाङ् निश्चय , देवक, सीमान्तपूजन , मधुपर्क , गौरीहर , अन्तःपटधारण , कन्यादान , कंकणबंधन , मंगळसूत्र बंधन , विवाह होम (लाजा होम) , सप्तपदी , ऐरणी दान , गृहप्रवेश व लक्ष्मीपूजन असे विधी केले जातात. या सर्व विधींची व त्यामागची भूमिका समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
💢 वाङ् निश्चय 💢
(वाक् = वाचा, निश्चय = निश्चिती ,शब्द देणे ) = वाङ् निश्चय म्हणजे शब्द देणे. पूर्वीच्या काळी विवाह हा चार दिवस चालत असे त्यामुळे परगावी असणाऱ्या वधूप्रमुखाकडे वरप्रमुखाने जाऊन वाङ् निश्चय केला जात असे. आता १ दिवसाच्या कार्यात आदल्या दिवशी वाङ् निश्चय केला जातो. प्रथम वरप्रमुखाकडून वधूप्रमुखाकडे मुलीची मागणी केली जाते. हि मागणी करताना दोघांच्या मागील तीन पिढ्यांचा उच्चार केला जातो कारण अनुवंशिकता, शारीरिक दोष साधारणपणे ३ पिढ्यांपर्यंत प्रामुख्याने उतरतात. सातव्या पिढी नंतर त्याचा परिणाम राहत नाही हे वैदिकशास्त्र सुद्धा मान्य करते पण वेदाने हे आधीच ओळखले आहे. आणि कोणतीही गोष्ट तीन वेळा विचारल्याबरोबर त्यामागचा त्यांचा उद्देश चांगला असतो अशी वधूप्रमुखाची खात्री पटते. अश्या प्रकारे मुलाकडून मुलीची मागणी घातल्या नंतर प्रथम स्वतः मग आपली पत्नी मग परिवाराचे व मुलीचे मत लक्षात घेऊनच वर प्रमुखाला शब्द दिला जातो .या नंतर वधूला यथाशक्ती अलंकार घालून तिचे पूजन केले जाते. कन्येच्या पित्याने गणपती पूजन करून कन्येच्या विवाह अंगभूत वाग्दान मी करतो असा संकल्प करायचा असतो.वधूवराच्या वंशावळीचा उच्चार करून वराची पारख करून कन्या देण्याचा शब्द द्यायचा व कन्येचे निरीक्षण करून तिच्यात काही दोष नाहीत याची खात्री करा असे वरपित्याला सांगावयाचे असते. (यात दोघान कडून सुपाऱ्या बांधून दिल्या जातात या आठवणीच्या म्हणून दिल्या जातात.) नंतर ब्राम्हणांनी आशीर्वाद द्यायचे,सुवासिनींनी औक्षण करायचं .उभय पक्षांनी ब्राम्हण पूजन करावे.वाङ् निश्चयाची सांगता व्हावी यासाठी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करावी.नंतर ब्राम्हणांनी सात ॠचात त्यांना आशीर्वाद द्यावयाचा. अश्या प्रकारे हा विधी पुरा होतो.
💢 सीमांत-पूजन 💢
विवाहविधी मुलीच्या मंडपामध्ये करण्याचे शास्त्र आहे,पण लग्नापूर्वी हा विधी मंडपामध्ये न होता तो गावच्या सीमेवर होत असे.सीमांत पूजन म्हणजे सीमेवर केले जाणारे पूजन. वाङ् निश्चय झाल्यानंतर नियोजित दिवशी वर वधूच्या गावी गेला कि त्याचे गावच्या सीमेवर पूजन केले जाते. यात वराची पूजा करून त्याला यथाशक्ती अलंकार घातले जातात. यामध्ये वराचे पाय धुवून त्याला नवीन वस्त्रे देण्यात येतात . विहिणीचे देखील पाय धुवून तिला साडी-चोळी व शिधा देण्यात येतो. वराचे पूजन करण्यापूर्वी सीमांत पूजनाचा संकल्प वधूपिता करतो . निर्विघ्नतेसाठी गणेश पूजन करून वरपूजन करतात .
पाय धुण्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. आरोग्यशास्त्रात सुद्धा बाहेरुन आल्यानंतर पाय धुवूनच वस्त्रे बदलावी असे सांगितले आहे. गरम पाण्याने पाय धुतल्यामुळे रक्ताभिसरण सुधारून थकलेल्या गात्रांना उत्तेजन मिळते. सीमांत पूजनाचे वेळी मुलीची मोठी बहिण विवाहित असली तर जेष्ठ जावयाचे पूजन करून त्यांचा सन्मान केला जातो. हल्ली वरमातेबरोबर वराकडील इतर मान्यवरांचे पाय धुणे हा प्रकार केवळ वधूपक्षाला दबावाखाली ठेवण्यासाठी केला जातो, हे योग्य नव्हे. वेद हा स्वच्छतेचा भोक्ता आहे. यामुळे यातून स्वच्छता हाच हेतू असून पाय कोणी धुवावे हा भाग गौण आहे.
💢 घाणा भरणे 💢
हल्ली सोईनुसार लग्नाचा दिवशी सकाळीच घाणा भरला जातो. हा विधी लग्न अगोदर करायचा असेल तर लग्नापूर्वी तीन , सहा व नववा दिवस वर्ज्य करावा. यावेळी ओव्यासुद्धा म्हणल्या जातात. उखळात उडीद , हळकुंड, सुपारी, तांदूळ घालून पाच सुवासिनी मुलगी व आई वडील मिळून कांडतात.
धान्य कांडण्यामागे कार्याला आलेल्या सर्व आप्तांसाठी अन्न तयार करणे हा उदेश आहे. हळद लावण्यामागे देखील शास्त्र आहे . आयुर्वेदात हळद हे anti-septic व चांगली कांती देणारे सांगितले आहे. तेल हे त्वचेला मऊपण देणारे आहे .हळद व तेलामुळे वधू वराला सुकांती प्राप्त व्हावी असा हेतू आहे.
💢 रुखवत 💢
रुखवत हा न्याहारी देण्याचा एक प्रकार. सात्विक आहार म्हणून हा द्यावा.शास्त्र सांगते म्हणून यात शिरा, दहीपोहे, असे पदार्थ असतात त्यात वरण-भाता सारखे अन्न नसते. उपाशीपोटी असलेल्याला मुलगी देऊ नये असे शास्त्र सांगते (कन्यादानाचे वेळी वराने उपहार केलेला असावा.)
कार्यालयात एका बाजूला मुलीला द्यायच्या गोष्टी मांडलेल्या असतात. या सर्व गोष्टी देण्यामागे जावई या वस्तू घेऊ शकत नाही अथवा या गोष्टी त्याच्या घरी नाहीत हा हेतू मुळीच नसतो, कन्येच्या जन्मापासून या गोष्टी तिच्या माता पित्याने जमवलेल्या असतात. कन्या हि एक दिवस तिच्या पतीच्या घरी जाणार या भावनेतून यावस्तू साठवल्या जातात. या गोष्टी कौतुकास्पद व्हाव्यात म्हणून त्या मांडणी करण्याची पद्धत पडली असावी. कालमानाप्रमाणे यथाशक्ती संसारोपयोगी वस्तू मांडण्याची पद्धत आहे.
लग्नाच्या दिवशी नवरदेवला वाजत गाजत आणतात या मागचा उद्देश असा कि आम्ही जे स्वीकारले ते समाजात मिरवत आणायचे. नवरदेवाला मांडवात (दारात) पुन्हा औक्षण करून त्याला आत आणतात. या नंतर वराचे मधुपर्क पूजन करतात.
💢 मधुपर्क पूजन 💢
मधुपर्क म्हणजे मध आणि दही यांचे मिश्रण हे स्नातक म्हणजे पदवीधर असलेल्या वराला देऊन त्याचे पूजन केले जाते. मधुपर्क पूजन हे सर्वांचे करता येत नाही नवरदेव, यज्ञातील मुख्य गुरुजी, व राजाकडील विशेष अतिथी यांचीच मधुपर्काने पूजा करतात.
या पूजेतील धार्मिक भाग सोडला तर त्या मागचे विज्ञान समजून घेण्यासारखे आहे.
आयुर्वेदात दही हे पित्तनाशक असून मध हे अमृत आहे असे मानले आहे.मध हा षड्रसयुक्त आहे म्हणून दूरवरून आलेल्या वराचे पित्त-शमन होऊन शारीरिक संतुलन ठीक होण्यासाठी मधुपर्क देतात. पाय धुण्यामागे स्वच्छता हा हेतू आहे; तर वराला ७ ते ८ वेळा आचमन सांगितले आहे,प्रवासातून आलेल्याला पाणी देण्याची पद्धत आहे,एकदम पाणी पिण्यापेक्षा थोडे-थोडे प्यावे त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते असे आयुर्वेददेखील सांगतो आणि सोवळे हे शुचिर्भुत होण्यासाठी आणि विधींसाठी मित्रमंडळींतून व नातेमंडळींतून वराला वेगळे काढण्यासाठी दिले जाते; त्यामागे अर्थ असा, कि यापुढच्या आयुष्यात त्याने सगळी तडजोड करावयाची आहे, मित्रपरिवार, लोभ व मोहापासून दूर राहून संसारात रममाण व्हावयाचे आहे.
💢 तेलफळ 💢
लग्नाच्या दिवशी पहाटेच मुलाकडील सुवासिनी मुलीसाठी तेलफळ आणतात. गौरीहरापाशी पहिली ओटी भरावी असे शास्त्र आहे. येथे तिची ५ फळे व हिरवी साडीचोळी, एखादा दागिना देऊन ओटी भरली जाते.ह्या ओटीसह मुलगी विवाहाच्यावेळी उभी राहते. हा विधी सर्वांकडेच केला जातो असे नाही.
💢 गौरीहर 💢
दाक्षायणीने कठोर तपश्चर्या करून शंकराला प्राप्त करून घेतले. महादेवासारखा पती मिळावा या चांगल्या हेतूने ही पूजा केली जाते. सजवलेल्या मंडपिमध्ये तांदुळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची स्थापना करून गौरीहराची पूजा केली जाते, काही ठिकाणी बाळकृष्ण ठेवण्याची पद्धत आहे. अन्नपूर्णा म्हणजेच दाक्षायणी. शंकरासारखा पराक्रमी, बलवान, पती प्राप्त व्हावा म्हणून हे पूजन. मुलगी ' गौरी गौरी सौभाग्य दे दारी आलेल्याला आयुष्य दे' अशी प्रार्थना करत थोड्या थोड्या अक्षता देवीवर वाहते.
अन्नपूर्णा देण्यामागे ज्या घरी ही मुलगी राहणार आहे त्या घरी तिने अन्नपूर्णे प्रमाणे वागून घरातील सर्वांची अन्नदात्री बनावे अशी धारणा. मंडपीची रचना करण्या मागे सुशोभित छताशिवाय देवाची आराधना करू नये असा संकेत आहे. लग्नाला उभी राहताना मुलगी मामाने दिलेली पिवळ्या रंगाची साडी नेसते. यालाच अष्टपुत्री म्हणतात. हे वस्त्र लग्न लागल्यानंतर दान करायला सांगितलेले आहे, ते दान करणय मागचा हेतू असा कि वधू या भूमिकेतून मुलगी आता पत्नी या भूमिकेत गेलेली असते म्हणून ते वस्त्र तिने परत नेसायचे नसते.
💢 औक्षण 💢
दिवा लागला कि अंधाराचा व क्लेशाचा नाश होतो , दिव्यामधून लक्ष्मीची उपासना सूचित होते. म्हणून दिवा हा महत्वाचा. कोणत्याही मंगलकार्या समयी औक्षण करतात. औक्षण हे आयुष्य-वृद्धीसाठी केले जाते. यामागे माणसाचे आनंदाने स्वागत करून प्रेम वृद्धिंगत व्हावे हा हेतू.
💢 अन्तःपटधारण 💢
मुहूर्त जवळ आल्यावर मंडपात मध्यभागी पूर्व पश्चिम अश्या तांदुळच्या राशी घालून राशीच्या मध्यभागी कुंकवाने दोन्ही बाजूंनी काढलेला अन्तःपट धरण्यात येतो. वधूला पश्चिमेकडच्या राशीवर पूर्वाभिमुख आणि वराला पूर्वेकडच्या राशीवर पश्चिमाभिमुख उभे करतात. वधूवरांना समोरासमोर येण्याचा हा पहिलाच प्रसंग असतो.अन्तःपटच्या मध्यभागी स्वस्तिक काढण्याचे कारण असे असावे कि वधूवरांना आपल्या जीवनासाठी सिद्ध व्हावे व स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे त्यावर दोघे लक्ष केंदित करू शकतात. याच वेळी मंगलाष्टके म्हणतात. मंगलाष्टक म्हणजे मंगल वचनांचे अष्टक म्हणजेच आठ श्लोकांचे असावे, मुहूर्ताची घटिका भरेपर्यंत हि गायली जातात, हल्ली दोन्ही पक्षांकडील नातेवाईक मंडळी हौसेनेपद्धतीत लाष्टके म्हणतात.हि चालू असताना संपूर्ण शांतता अभिप्रेत आहे. असे क्वचितच घडते. नातेवाईकांनी देखील मुलामुलींचे व आईवडिलांचे नाव गुंफून मंगलाष्टके रचून हौस भागवण्यापेक्षा मुलामुलींना ज्या आयुष्यात सामोरे जायचे आहे त्याची कल्पना देणे हे इष्ट.
मुहूर्तावर मंगलाष्टके संपल्यानंतर अन्तःपट दूर करून वधूवर एकमेकांना हार घालतात, व दोन्ही बाजूंच्या करवल्या दोघांच्या डोळ्यांना पाणी लावून औक्षण करतात.
हार घालण्यामागचे सूत्र असे कि लग्न लागताना कुलदेवतेचे स्मरण करून जे प्राप्त होईल त्याचा स्वीकार करण्यास सिद्ध होणे,जेथे स्वीकार तेथे हार ; देव, राजा, नेता यांना आपण हार घालतो कारण आपण त्यांचा स्वीकार करतो. मुंडावळ्या का घालाव्यात यामागेदेखील शास्त्र असे कि मोती कोणी धारण करावे यामागे काही नियम आहेत, राजाने शौर्याचे प्रतिक म्हणून हे धारण करावे, मांडवात वधू-वर ओळखून यावेत म्हणून मोत्याच्या मुंडावळ्या त्यांनी धारण कराव्या.
लग्न लागताना अक्षता उधळण्याची पद्धत आहे, वास्तविक हि पद्धत योग्य नव्हे. अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ, तांदूळ हे अन्न आहे ,अन्न हे पूर्ण ब्रम्ह असे आपण म्हणतो मग हे असे पायदळी तुडवणे बरोबर नाही. कारण हल्ली कार्यालयात खूप गर्दी असते, मागील लोकांच्या अक्षता वधू-वरापर्यंत पोहचत नाहीत व आपले अक्षतारुपी आशीर्वाद फुकट जातात त्यापेक्षा जेव्हा वधूवरांना भेटायला आपण स्टेजवर किंवा मांडवात जातो तेव्हा त्या त्यांच्या मस्तकावर वाहाव्यात. कांही पद्धतीत आता कालानुरूप आणि परिस्थिति अनुरूप बदल करणे अपरिहार्य आहे.
अक्षता वाहून आशीर्वाद देणे हा निश्चितच शास्त्र-शुद्ध व श्रेष्ट विधी आहे , पूर्वी मंडपात चपला घालून लोक येत नसत. आता या टाकलेल्या अक्षतांवर चपला-बुटांचे पाय पडतात. अश्या पूर्णब्रम्ह अन्नाला पायदळी तुडवणे बरोबर नव्हे. ज्या अन्नाकरता आपण अहोरात्र कष्ट करतो ते अश्याप्रकारे अपमानित होउ नये हा उद्देश.
💢 कन्यादान 💢
लग्न लागल्या नंतर महत्वाचा विधी म्हणजे कन्यादान . कन्यादानापेक्षा कन्यानिवेदन हा शब्द योग्य कारण अपत्य दान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, दत्तक देऊ शकता. योग्य वराकडे संस्काराच्या माध्यमातून योग्य कन्या निवेदन करायची थोडक्यात तिचा पालकत्व त्याच्या परिवाराकडे सोपवायचे. कन्येचा स्वीकार करताना 'धर्माप्रजा सिध्यर्थं कन्यां प्रतिगृण्हामि' असे वर म्हणतो, प्रजा हि सर्वांचीच वाढत असते पण धर्माप्रजा म्हणजे काहीतरी विचार करून निर्माण केलेली प्रजा. आपली येणारी पुढची पिढी हि आपल्यापेक्षा विकसित व चांगली असावी हा उद्देश.पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी , पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून विष्णूस्वरूप वराला आपली लक्ष्मीस्वरूप कन्या सुपूर्त करावी. कन्या देताना वराला काही अटी घालूनच देतात, 'धर्मेच नातिचरामी' 'अर्थेच नातिचरामी' 'कामेच नातिचरामी ' असे त्याच्या कडून वदवून घेऊनच त्याला कन्या देतात. याचा अर्थ असा कि धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्यातले पहिले तीन हे गृहस्थाश्रमात प्राप्त होतात ते उपभोगुनच चौथ्या पुरुषार्थ प्राप्त करायचा पण हे उपभोगताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक होता कामा नये. म्हणून वर तिथे नातिचरामी म्हणजेच कोणत्याही बाबतीत मी अतिरेक करणार नाही असे वचन देतो.या संस्कारात वधूपिता कोठेही 'इदं न मम' असे म्हणत नाही. या संस्काराची सांगता व्हावी, आपली प्रतिष्ठा व महत्व वाढावे म्हणून सोळा प्रकारच्या वस्तू कन्येस द्यायला सांगितल्या आहेत यज्ञाचे पुण्य मिळावे म्हणून धेनुदान, वराहाने धारण केलेली पृथ्वी स्थिर व्हावी म्हणून भूदान, मुलीच्या सेवेसाठी नोकरचाकर,विष्णू हा शेषशाई आहे म्हणून वराला शैय्यादान , सर्व सोपस्कार पूर्ण व्हावे म्हणून गृहदान , दुध-तुपासाठी म्हैस ....अर्थात या सर्व गोष्टी देणे आजकाल अशक्य व गैरसोईचे आहे तरी किमान पंचधातू हे या वेळी द्यावेत.
यामागे अजून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे या गोष्टी मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून दिल्या जातात, स्वतःच्या मुलीपेक्षा त्यांना कोणचीही गोष्ट मौल्यवान नाही व किती दिले हे महत्वाचे नसून या मागच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत.
हा विधी करताना कन्येचे हात हा सगळ्यात खाली त्यावर वराचे हात त्यावर कन्येच्या पित्याचा हात असा क्रम असतो, वास्तविक जी गोष्ट द्यायची ती मध्ये पाहिजे; म्हणजे घेण्या-याचे हात सगळ्यात खाली पाहिजेत. पण या ठिकाणी कन्येचे हात खाली असतात कारण कन्या हि भूमी स्वरूप म्हणजे स्थिर आहे. विवाहानंतर ती तिच्या सासरी गेली व ती तिथे पत्नी,काकू,मामी,आई या कोणत्याही नात्यात गेली तरी माहेरी तिची कन्या म्हणूनच भूमिका राहते,लग्नानंतर कितीही वर्षांनी ती माहेरी आली तरी अमुकांची सून घरी आली असा उल्लेख न करता लेक घरी आली असेच सर्वजण म्हणणार ;म्हणजेच कन्या हि तिच्या भूमिकेत स्थिर आहे. भूदान करताना आपण भूमी उचलून देऊ शकत नाही ती तिथेच राहते.
💢कंकणबंधन 💢
कन्यादानाच्या विधी नंतर वर कन्येच्या उजव्या कुशीला स्पर्श करून देवाकडे आवडती संतती देण्याची आकांक्षा करतो.नंतर दोघांना समोरासमोर बसवून दुधात भिजवलेल्या पांढ-यासुताने त्यांच्या कंठाला व कटीला चार अथवा पाचवेळा वेढे देतात नंतर कटीचे सुत दोघांच्या वरून व कंठाचे सुत जमिनीवर ठेवून ते काढून घेतात त्याला हळद व कुंकू लावून हळकुंड बांधून कमरेजवळच्या सुताने केलेले कंकण वराच्या उजव्या मनगटाला वधू बांधते. व कंठाजवळच्या सुताने केलेले कंकण वर वधूच्या डाव्या मनगटाला बांधतो. याला कंकणबंधन असे म्हणतात.व्रतस्थ असणा-या वधूवरांनी बंधनात (नियमावलीत) राहावे म्हणून हे बंधन. हे चार दिवसांनी सोडतात. सुतामुळे संरक्षण मिळते हा देखील त्यामागचा हेतू.
💢 मंगळसूत्रबंधन 💢
वरमातेने दिलेले वस्त्र परिधान केल्यानंतर वराने मंगळसूत्र वधूच्या कंठात बांधायचे. यामागचा उद्देश असा असावा की मंगल म्हणजे पवित्र ,सूत्र म्हणजे दोरा, वस्त्राने लज्जारक्षण होते. मंगळसूत्रातील काळ्या मण्यांमुळे दृष्टीबाधा होण्यापासून संरक्षण मिळते. दोन वाट्या चार मणी हे सुवर्णाचे हवे त्यापैकी एक वाटी दोन मणी सासरचे व एक वाटी दोन मणी माहेरचे. हे सोन्याचे करण्यामागे कन्येला अलंकृत करणे हा हेतू. मंगळसूत्र हे सौभाग्यचिन्ह विशिष्ट रीतीने गुंफून ते घालायचे व सासर-माहेर दोन्ही कुटुंबे एकत्र करून संसार माळेसारखा बांधून ठेव असा संदेश कन्येला द्यायचा. मंगळसुत्रामुळे विवाहित स्त्रीला प्रतिष्ठा मिळते. धर्माने मंगळसूत्र हे रक्षणार्थ दिले आहे कायद्याने ते बंधनकारक नसले तरी मंगळसुत्रातून संरक्षणाचा विश्वास दिला आहे म्हणजे स्त्री हि अबला आहे असा अर्थ काढू नये. अन्य सौभाग्यअलंकारामध्ये जोडवी, बांगड्या, यांचा समावेश होतो. जोडवी घालण्यामागे शास्त्राधार आहे मधल्या बोटाच्या नसा विशिष्ट प्रकारे दाबल्या जातात (Acupressure) त्यामुळे शरीरावर योग्य परिणाम होतो. कुंकू लावण्यामागे देखील शास्त्र आहे की मधल्या बोटाने कपाळावर विशिष्ट ठिकाणी ऊर्ध्व दिशने दाब देऊन कुंकू लावतात. त्या ठिकाणी मेंदूकडे जाणारी नस असते ती दिवसातून ३ - ४ वेळा दाबली तर मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो. पुरुषांनी गंध लावण्यामागे हाच हेतू. कुंकुवामुळे भालप्रदेशाला शोभा येते ते वेगळे.
💢 विवाह होम 💢
विवाह हि प्रतिज्ञा आहे. ती आत्तापर्यंत वधूवरांनी घेतलीच. या विधीत तीच प्रतिज्ञा आता अग्नीच्या साक्षीने घेतली जाते, देवाग्निद्विजसंनिधौ म्हणजेच देव, अग्नी व ब्राम्हण
यांच्या साक्षीने.याठिकाणी योजक नावाच्या अग्नीची स्थापना केली जाते. प्रत्येक संस्कारातील अग्निंची नावे वेगळी आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण निर्माण होत नाही कारण यात साजूकतुपाचीच आहुती दिली जाते याने वातावरण शुद्ध होते. अग्नी सिद्ध केला म्हणजे बोलावला , तो यज्ञकुंडात असल्याने मर्यादित आहे. जो मर्यादित आहे तो उपकारक आहे. पसरला कि त्याची आग बनते.
वराने अग्नीसमोर पाणिग्रहण करायचे आहे. पत्नीचा उजवा हात उताणा अंगठ्यासहित हातात घ्यायचा आहे याचाच अर्थ असा कि तिला सर्व गुणदोषासहित स्वीकारायची आहे. आपण हस्तांदोलन करताना अंगठा बाहेर ठेवतो. मात्र लग्नात वराने व मुंजीत पित्याने अंगठ्यासहित हात हातात धरायचा आहे. म्हणजेच त्याचा पुर्णत्वाने स्वीकार करावयाचा.
पाणिग्रहण योग्य मुहूर्तावर व्हावे असे शास्त्र सांगते पण मग लग्नाचे दोन मुहूर्त काढायचे का?....याचे उत्तर असे कि मंगलाष्टके कधीही म्हणावीत पण मंत्र योग्यवेळीच म्हणले गेले पाहिजेत. अर्थात विवाहात सर्व समाजाला सामाविष्ट करायचे आहे. त्यासाठी विशिष्ट वेळ हवी म्हणून लग्नाचा मुहूर्त काढायची पद्धत पडली. शास्त्रापेक्षा रूढी व परंपरा श्रेष्ठ ठरतात असा पूर्वापार संकेत आहे. या साठी पाणीग्रहणाऐवजी विवाह मुहूर्त काढला जातो.
💢 लाजा होम 💢
विवाहहोमाजवळ मुलीचा भाऊ उत्तराभिमुख बसतो. प्रथम त्याचे हात निर्जंतुक व्हावेत म्हणून त्याच्या हाताला तूप लावले जाते.नंतर भाऊ मुलीच्या ओंजळीत लाह्या घालतो. नंतर विशिष्ट मंत्राने वधूवरांनी ह्या लाह्या अग्नीत द्यायच्या.नंतर अग्नीला प्रदक्षिणा करून पाट्यावर अथवा सहाणेवर मुलीने उभे राहायचे. असे तीन वेळा केले जाते.
ह्या ठिकाणी लाह्या वापरल्या जातात कारण आपले जीवन ज्या अन्नाशी निगडीत आहे असे अन्न अग्नीला द्यावे ; लाह्या ह्या साळीच्या असतात व ते पूर्ण अन्न आहे व भाजलेल्या असल्याने त्याला दोष नाही.
प्रत्येक प्रदक्षिणे नंतर वधू पाट्यावर किंवा सहाणेवर उभी राहते याचा अर्थ असा कि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी जसा पाषाण स्थिर असतो तशी संसारात तू स्थिर राहा.
यानंतर या विधीत लाह्या देऊन मदत केल्याबद्दल वधूच्या भावाचा काहीतरी देऊन मान केला जातो. कानपिळी हा विधी शास्त्रात नाही. कारण ज्यावराला आपण विष्णुस्वरूप मानतो त्याचा कानपिळणे कितपत योग्य? कानपिळी यातून शिक्षा अभिप्रेत होते.भावाचा सन्मान करावा याबद्दल देखील शास्त्र असे कि, धर्म कोणाचेही ऋण ठेऊ देत नाही, आणि म्हणून सुवासिनीने औक्षण केल्याबद्दल लगेच तिला कुंकू लावून लगेच ऋणमुक्त व्हावे व आहेर करणा-या व्यक्तीला आहेर घेतल्यानंतर किमान नारळ परत द्यावा.
💢 सप्तपदी 💢
सप्तपदी या विधीत वधूवरांनी एकत्र सात पावले चालायची असतात. प्रत्येक पावलामागे वर विविध आशा व्यक्त करतो.
पहिल्या पावलात तिचे स्वागत आहे.दुस-या पावलात तिने उर्जा व बल द्यावे अर्थात अन्नपूर्णा म्हणून यावे असे सांगितले आहे. तिस-या पावलात तिने सर्वांना माया धन व ऐश्वर्यसंपन्न करणारी हो अशी अपेक्षा आहे.चौथ्या पावलात सर्व कुटुंबाला माया, प्रेम देऊन बांधून ठेवणारी हो अशी अपेक्षा आहे. पाचव्या पावलात वंशवृद्धीसाठी संततीवर्धक हो अशी अपेक्षा. सहाव्या पावलात प्रत्येक ऋतूमध्ये मला साथ देणारी हो सातवे पाऊल सखा सप्तपदी भव म्हणजेच आपले हे नाते नवराबायको प्रमाणेच चांगले मित्रमैत्रिणीचे असो हि अपेक्षा व्यक्त केली आहे. या नंतर कलशातील जलाने उभयतांवर अभिषेक केला जातो.यात आशीर्वाद देऊन तुम्ही दोन्ही जीव एकमेकांना कल्याणकारक होवो अशी इच्छा व्यक्त केली जाते.
गृहप्रवेशनीय होम हा घरी केला जातो पण हल्ली कार्यालयात हा होम केला जातो. हा होम झाल्यानंतर येथे स्थापन केलेला अग्नी घरी नेण्यास सांगितला आहे पण ते शक्य नसल्याने एक पळसाची समिधा अग्नीवर तापवून तो अग्नी त्या समिधेत प्रविष्ट झाला अशी कल्पना करून ती समिधा बांधून वराकडे दिली जाते मग घरी जाऊन हा अग्नी कुंडात स्थापन करून पुढे होणारे सर्व संस्कार यावर करण्यास सांगितले आहे आणि तो आयुष्याच्या शेवटी दहना पर्यंत वापरायचा असे सांगितले आहे. या ठिकाणी होमाजवळचे तूप वधूच्या हृदयाला लावले जाते, हृदयशुद्धता हा यामागचा हेतू असावा.
नंतर वधूवरांना धृवादी ताऱ्यांचे दर्शन घ्यायला सांगितले आहे.या मागे ध्रुव जस आपल्या ठिकाणी अढळ आहे तसे तुम्ही संसारात अढळ राहा हा संदेश.
गौरीहरात पूजलेली देवी वराने आपल्या घरी न्यावी यावेळी काही ठिकाणी आंबा शिंपणे हा विधी केला जातो. याला शास्त्राधार नाही. गौरीहरापाशी बसवून वराला दूध प्यायला द्यायचे व वधूची तिच्या आईने मालत्यांनी ओटी भरायची असेते. दिवसभराच्या कार्याने दमलेल्या मुलीला घरी गेल्यावर काही स्वयंपाक करायला लागू नये फक्त या मालत्या दुधात भिजवून साखर घातली कि त्याची खीर होते थोडक्यात 'instant food'!! अर्थात पौष्टिक; हा उद्देश असावा. देवी का द्यायची तर देवीची मूर्ती घरातल्या देवघरात ठेवायची म्हणजे तेथे तिला जागा करूनच ठेवली जाते. तशीच आमच्या चालत्या बोलत्या मुलीला तुमच्या घरात मानाचे स्थान देऊन समाविष्ट करून घ्या अशी कल्पना त्यामागे असावी.
💢 ऐरणी दान 💢
कन्यादान व विवाहसंस्काराची सांगता या विधीने होते ; या कर्माचे फळ प्राप्त होण्यासाठी हा विधी केला जातो. हा विधी चौथ्या दिवशी केला जातो पण हल्ली त्याच दिवशी कार्यालयात हा विधी केला जातो.या ठिकाणी वरमातेचे यथाशक्ती पूजन करून तिची पांढरी साडीचोळी, सौभाग्यवायन (आरसा, कंगवा, कुंकू, मणी, मंगळसूत्र ) दिले जाते. नंतर सुपात / रोवळीत सोळा दिवे ठेऊन प्रथम उमा-महेश्वराची पूजा करून हे दिवे कन्येचा पिता प्रथम कन्येच्या मग वराच्या मग सासू सासऱ्यांच्या डोक्यावर धरत जातात. आई दिव्याखाली कापड धरते . नंतर ते सूप अथवा रोवळी वरमातेला दान केली जाते. दिवे डोक्यावर धरण्याचा अर्थ असा कि आज पासून त्यांनी मुलीची जबाबदारी तुच्यावर सोपवली आहे. याठिकाणी वेळूपासून तयार केलेले पात्र वापरण्यामागचे कारण असे कि वेळू म्हणजे बांबू ; हे झाड कापले तरी त्यातून पुन्हा कोंब फुटून नवीन झाड तयार होते ते मरत नाही, असाच आमच्या वंशाचा विस्तार होत राहावा हा उद्देश. सूप व रोवळी यांना वंश पात्र या करताच म्हणले जाते.
गौरीहरासमोरून देवी उचलली कि त्या पाट्यावर वराकडच्यांनी सौभाग्यवायन ठेवायचे असते, त्याला पाट्यावरचे वाण असे म्हणतात हे मुलीच्या मामीकरता असते.ते स्थान रिकामे राहू नये म्हणून हे वाण मांडले जाते.
ह्या ठिकाणी वरपक्षाची प्रार्थना केली जाते त्याचा थोडक्यात अर्थ असा कि हि मुलगी आजपर्यंत आम्ही आमच्या मुलाप्रमाणे वाढवली आहे ती आता तुमच्या घरची सून आहे तिला तुमच्याकडील रिती-रिवाज या बद्दल माहिती नाहीये तरी तिला तुमच्याकडील सर्व गोष्टी समजावून सांगून तिचा तुमच्या मुलीप्रमाणे सांभाळ करा.
💢 सुनमुख 💢
सासूने प्रथम सुनेचे मुखावलोकन करणे याला सुनमुख असे म्हणतात,धर्माने कोणत्या मांडीवर कोणाला बसवावे ह्याचे विवेचन केले आहे. सून हे अपत्य म्हणून स्वीकारायचे म्हणून सासूला मध्यभागी बसवून एका मांडीवर सुनेला व दुस-या मांडीवर मुलाला बसवायचे व आरश्यात सुनेचा चेहेरा पहायचा, तिच्या पाठीवरून हात फिरवायचा तिची वेणी घालायची.आरश्यात पहायचे कारण असे कि अलंकृत अश्या मुलीला दृष्ट लागू नये कारण प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही 'रूप हे आरश्यात पहायचे व स्वरूप हे डोळ्यात साठवून ठेवायचे.मुलीची बावरलेली नजर आरश्यात दिसते तिला सासूने धीर द्यायचा थोडक्यात यापुढे आईची माया तिला द्यायची जबाबदारी सासूची. सासूने मुलीच्या भांगेत कुंकू घालून तिला सौभाग्याची जाणीव करून द्यायची. अलंकार अनेक केले जातात पण मंगळसूत्र व कुंकू अनेक प्रकारची एकाच वेळी घालू शकत नाही कारण मंगळसूत्र धारणाचा अधिकार तपामुळे प्राप्त होतो तो मुलीने स्वतःच्या कर्तुत्वाने व विश्वासावर टिकवायचा आहे.
💢 गृहप्रवेश व लक्ष्मीपूजन 💢
ऐरणी दान झाल्यानंतर मुलीकडचे सर्व विधी संपतात. वधुवराला वरातीतून मिरवून वराच्या घरी आल्यानंतर दारातील तांदुळाने भरलेले माप ओलांडून वधू गृहपवेश करते यालाच गृह प्रवेश म्हणतात. वधु हि लक्ष्मी स्वरूप असते म्हणून पुढचा विधी लक्ष्मीपूजन हा असतो. यात गणपती पूजन, स्वस्ति-पुण्याह वाचन करून तांदुळाने भरलेल्या ताटात सोन्याच्या अंगठीने नववधूचे नामकरण केले जाते. सासूरवाडीतून आणलेल्या देवीची पूजा करून प्रतिष्ठा केली जाते. पूर्वीच्या काळी सर्वानुमते येणारी मुलगी कोणत्या नावाने स्वीकारायची हा ठरवण्याचा अधिकार मुलाकडच्यांचा असे म्हणून हा विधी. आताच्या काळात नाव बदलावे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा विधी सुद्धा हल्ली सोयीनुसार कार्यालयातच केला जातो.
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💝💝💐🙏🏻🙏🏻
🔸▶ अजिंक्य कुळकर्णी ◀🔸
जन्मपत्रिका विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन
🔵【सशुल्क मार्गदर्शन】 🔵
9422353522 / 7723073522
समस्या नाही असा मनुष्य नाही, अन उपाय नाही अशी समस्या नाही..!
🙏🏻🍁☘☘🍁🍁☘☘🍁🙏🏻
No comments:
Post a Comment