Friday, 20 June 2025

यजमानांचे नजरेतुन अंत्यक्रीया. फेसबुकवर आलेला लेख आहे प्रसिद्ध लेखिका सौ शेफाली वैद्य यांचे मातोश्रींचे नुकतेच निधन झाले त्याबाबतीत त्यांनी मांडलेले विचार आहेत हिंदू अंत्येष्टी – शोक व्यक्त करण्याची पवित्र प्रक्रियाआईच्या जाण्याबद्दलचा हा माझा शेवटचा सार्वजनिक लेख. हा लेख अंतिम संस्कारांकडे डोळसपणे पाहणारी एक श्रद्धावान आणि जिज्ञासू हिंदू व्यक्ती ह्या भूमिकेतून मी लिहिलाय. इथे मला आधीच हे स्पष्ट करायचंय की मी ना कोणी धर्मशास्त्रज्ञ आहे, ना संस्कृत पंडित, ना मी पूर्णपणे बरोबर असल्याचा दावा करतेय. पण मातृशोकातून जाताना आणि हिंदू अंत्येष्टीची सर्व कर्मकांडे श्रद्धापूर्वक पार पाडताना देखील विवेकी जिज्ञासेचा तिसरा डोळा उघडा ठेवून सामान्य माणसाला कधी कधी अगम्य, क्वचित भयावह वाटू शकणाऱ्या या विधींमागचा गहन अर्थ समजून घ्यायचा मी यथाशक्ती प्रयत्न केला. त्यासाठी मी मन्मथनाथ दत्त यांनी केलेला गरुडपुराणाचा संपूर्ण अनुवाद परत एकदा वाचला. Tibetan Book of the Dead आधीच वाचलं होतं. त्याशिवाय ग्रिफ मॅनेजमेंट ह्या विषयावर आधारित बरंच पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिलेलं मानसशास्त्रीय साहित्य वाचलं आणि अर्थातच, प्रत्यक्ष विधी सुरु असताना आमच्या पुरोहितांना हजार प्रश्न विचारले. त्यांनीही अतिशय शांतपणे आणि न कंटाळता माझ्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या सर्वाचा परिपाक म्हणजे हा लेख. ह्यात जे काही लिहिलंय, ते माझ्या वैयक्तिक अनुभवावर आणि मी मिळवलेल्या धार्मिक माहितीवर आधारित आहे. हे इथे शेअर करण्याचा एकमेव उद्देश्य म्हणजे मला जे उमगलं ते इतरांनांही कळावं. बरेचदा आपण ही सारी कर्मकांडे करतो पण त्या मागचा अर्थ कोणी सहजासहजी आपल्याला नीट उलगडून सांगत नाही. जवळच्या माणसांच्या मृत्यूनंतरचे विधी सर्वांनाच कधी ना कधी करावे लागतात, पण त्यामागचा सांकेतिक अर्थ जर कळला तर नक्कीच वियोगाच्या दुःखावर फुंकर मारल्यासारखं होतं हे मी स्वतः गेल्या १२ दिवसात अनुभवलेलं आहे. इतर कुणाच्या शोकप्रवासात जर हा लेख थोडी तरी सोबत करू शकला तर मी भरून पावेन. मी एक श्रद्धावान हिंदू आहे. माझ्या आयुष्यात मी अनेक वेळा वेगवेगळ्या स्वरूपात अग्नीची आराधना केली आहे, कधी देवापुढे दिवा लावून तर कधी घरी होम करवून. अनेक यज्ञही मी पाहिले आहेत, पण ज्या दिवशी माझ्या भावाने माझ्या आईच्या चितेला अग्नी दिला, त्या दिवशी मला खर्‍या अर्थाने कळलं की अग्नी ही संक्रमणाची देवता आहे. चितेला अग्नी देण्याचा क्षण हा केवळ लाकूड जाळण्याचा क्षण कधीच नसतो. तो एका रूपाचं अरूपात रूपांतर करण्याच्या प्रवासाचा आरंभक्षण असतो. चिताग्नी हा तो अग्नी आहे जो वेदात वर्णिला गेलाय, साक्षी, शुद्धिकर्ता, आणि आत्म्याला दुसऱ्या लोकात घेऊन जाणारं दिव्य वाहन.अंत्येष्टी हा हिंदू सोळा संस्कारांपैकी शेवटचा संस्कार. शेवटची आहुती. आपण जिवंत असताना जसे यज्ञ किंवा होम करताना अग्नीला आहुती देतो, तसाच हा कुठल्याही व्यक्तीचा शेवटचा यज्ञ, आणि याची आहुती म्हणजे त्याचं स्वतःचं नश्वर शरीर. यज्ञांमध्ये सामान्यतः अग्नी हा केवळ वाहक असतो. पण अंत्येष्टिमध्ये तो आहुतीचा भक्षकही असतो आणि ती हवी देवांपर्यंत पोचवणारा वाहकही असतो. ज्या पंचमहाभूतांपासून देह बनलेला असतो त्याच पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ह्या पंचमहाभूतांमध्ये देह परत विलीन होतो. मी लहान असताना माझ्या आजोबांना पत्रात हा मजकूर लिहिताना अनेक वेळा वाचलं होतं की अमुक अमुक यांचा देह पंचमहाभूतांत विलीन झाला. तेव्हा या वाक्याचा पूर्ण अर्थ कधीच कळला नव्हता. पण गेल्या बारा दिवसात तो नीटच कळला. आईला मुखाग्नी द्यायच्या आधी माझा भाऊ जो कर्ता होता, त्याने चितेला तीन उलट्या प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या खांद्यावर पाण्याने भरलेला मातीचा माठ होता, ज्याला भटजी एका छोट्या दगडाने प्रत्येक प्रदक्षिणेत एकेक भोक पाडत होते ज्यातून आतलं पाणी गळत होतं, आधी छोटी धार आणि नंतर मोठी. प्राण जसा हळूहळू शरीर सोडतो, तसंच हे पाणी माठातून निःशब्दपणे निघून जात होतं. तीन प्रदक्षिणा झाल्यावर त्याने तो माठ मागे न पाहता डाव्या खांद्यावरून जमिनीवर जोरात फेकून फोडला. घटभेदन — अंत्येष्टीतील सर्वात विदारक क्षण. जो आपल्याला शिकवतो की त्या माठासारखं मृत शरीर कितीही सुंदर दिसत असलं, तरी आत प्राण नसताना ते नुसतंच एक रिकामं कवच असतं आणि ते नष्ट करावंच लागतं. किंबहुना आपण ते नाही केलं तर निसर्ग ते शरीर नष्ट करणारच असतो. तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा स्मशानात गेलो, आईच्या अस्थी संकलनासाठी. खाली वाकून तिच्या अस्थी अलगद उचलून एका तांब्याच्या कलशात ठेवताना मला खूप भरून येत होतं. ज्या प्रेमाने आम्ही भावंडं तिच्या गालावरून हात फिरवायचे, त्याच मायेने आणि हळुवारपणे आम्ही त्या अस्थी आणि थोडीशी रक्षा कलशात भरली. उरलेली सर्व राख आम्ही कुंकळ्ळीच्या पवित्र आणि वीरप्रसवा साळ नदीत विसर्जित केली. काही काळ प्रवाहावर तरंगून ती राख हळूहळू पाण्यात विरत गेली. त्यानंतर आम्ही तिच्या अस्थी कारवारच्या काली नदीत विसर्जित केल्या. कारवार आईचं जन्मगाव. काली नदी आईला खूप आवडायची. जिथे काली नदीचं गोडं पाणी सागराशी एकरूप होतं तिथेच तिच्या अस्थी आम्ही विसर्जित केल्या. जीवाचं ब्रह्मात विलीन होणं, अस्तित्वाचं अव्यक्तात विलीन होणं ह्याचंच जणू प्रतीक असलेली ती जागा होती. ते पहिले तीन दिवस आणि त्यानंतरचे सात दिवस अशौचाचे होते, शोकाचे आणि सामाजिक निवृत्तीचे. ना नवे कपडे, ना देवपूजा, ना चमचमीत जेवण, फक्त विरहाच्या शांततेत डुंबलेलं घर आणि एकत्र बसून आईच्या आठवणी काढणारे आम्ही कुटुंबीय. कोणी शोक प्रदर्शनासाठी येई तेव्हाही त्याच आठवणी निघत, आमचं दुःख हळूहळू हलकं होत होतं. प्रत्येक दिवशी आईच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही तिलोदक अर्पण करत होतो. हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की मृत्यूनंतरच्या दहाव्या दिवसापर्यंत मृत व्यक्तीचा आत्मा पितृलोकात जात नसतो. तो अजूनही पृथ्वी लोकातच भटकत असतो धूसर अवस्थेत, गोंधळलेल्या मनस्थितीत. तिलोदक आत्म्याला दिशा देतं, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी.दहाव्या दिवशी, पुरोहितांना घेऊन आम्ही पुन्हा स्मशानात गेलो. धर्मशास्त्राप्रमाणे आता आईची पुढच्या प्रवासाची तयारी झाली होती. आता ती केवळ ‘आई’ राहिलेली नव्हती — ती आता आमची पूर्वज बनणार होती. आमच्या पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण करत तांदूळ आणि तिळाचे दहा पिंड तयार केले. ते सूक्ष्म शरीराचे प्रतीक होते. त्या पिंडांसोबत दर्भाच्या लहानश्या छत्र्या आणि ज्योती अर्पण केल्या गेल्या, दिवसा सावलीसाठी, रात्री प्रकाशासाठी. पुरोहितांनी जेव्हा त्या दर्भाच्या छोट्या मशाली तुपात भिजवून प्रज्वलित केल्या तेव्हा त्यांचा उजेड आमच्याही दुःखाचा अंधार हळूहळू नष्ट करत होता. हिंदू धर्मात कोणीही एकटा जात नाही. प्रत्येक आत्मा मृत्यूनंतर कुलपरंपरेत पूर्वज म्हणून सामील केला जातो. हिंदू धर्म संस्कृतीचा अविरत प्रवाह मानतो.अकराव्या दिवशी पुरोहितांनी येऊन घरी होम घातला आणि आमचं घर आणि आम्ही मृत्यूनंतरच्या अशौचातून परत शुद्ध झालो. पंचगव्य शिंपडून घर पवित्र केलं गेलं. आम्हीही सर्वजण एकेक थेंब प्यायलो. आता आम्हीही इतके दिवस थांबवून ठेवलेल्या आयुष्याच्या प्रवाहाला पुढे नेण्यासाठी तयार होतो. बाराव्या दिवशी सपिंडीकरण होते. अंत्येष्टी संस्कारातला सर्वांत शेवटचा आणि निर्णायक विधी. आईचा पिंड आणि आमची आजी, पणजी, आणि शेणजी यांचे पिंड भावाने विधीपूर्वक एकत्र केले. धर्मानुसार आता आमची आई पितृ झाली होती. आता ती फक्त आमची आई नव्हती, आता ती आमच्या संपूर्ण कुळाची मार्गदर्शिका होती. आता ती आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांची पूर्वज बनली होती. हा निरोप नव्हता. ही होती नवीन नात्याची जाणीव. आमच्या कुलपरंपरेच्या अविरत वाहणाऱ्या प्रवाहात माझी आई एक नवी लाट बनून विलीन झाली होती. त्यानंतर आला शेवटचा विधी, शुभस्वीकार. अशौचाचा, दुःखाचा काळ आता संपला होता. आता आम्ही पुन्हा आयुष्याला आनंदाने सामोरे जायला मोकळे होतो. इतके दिवस दहन संस्कार करताना वापरलेला कोरा सुती पंचा नेसून सर्व विधी करणाऱ्या माझ्या भावाने आता ते कपडे सोडून रंगीत रेशमी कद परिधान केला, कपाळावर शुभसूचक कुंकुमटिळक लावला आणि हवन केलं. आईच्या द्वादशश्राद्धाला आमचे आप्तेष्ट जमले होते. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. बारा दिवसांच्या संयम आणि शोकानंतरचं पहिलं एकत्रित जेवण. जेवताना आईच्या आठवणी निघाल्या, तिच्या विनोदांची उजळणी झाली, तिच्या मायेच्या स्पर्शाची सर्वानी आवर्जून आठवण काढली. आमच्या मनावरचं दुःखाचं, शोकाचं सावट हळूहळू दूर होत होतं. ह्या बारा दिवसांच्या प्रवासात मला जाणवलं की हिंदू धर्म जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या कुटुंबियांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. बारा दिवस मनसोक्त शोक करू देतो. आपली कर्मकांडे म्हणजे दुःखाचा नीट, शास्त्रोक्त निचरा करायचा एक फॉर्मुला आहे. आपले विधी केवळ धार्मिक नाहीयेत तर मानसशास्त्रीयदृष्ट्या फार अचूक आणि सूक्ष्म विचार करून आपल्या पूर्वसुरींनी रचलेले आहेत.साधे मंत्र उच्चारतानाही अतिशय विचार करून शब्द योजले गेले आहेत. देवांना आहुती दिली जाते तेव्हा ‘स्वाहा’ म्हटलं जातं.पितरांना काही अर्पण केलं की ‘स्वधा’ हा शब्द उच्चारतात तर प्रेतात्म्याला बोलावताना पुरोहित म्हणतात — ‘उपतिष्ठत’. शब्द बदलतात. अर्थ बदलतो. ध्वनी स्पंदन बदलतं. यज्ञोपवीताची दिशा सुद्धा बदलते. देवकार्य करताना ते डाव्या खांद्यावर असतं — सव्य. पितृकार्य करताना उजव्या खांद्यावर — अपसव्य. ते करत असताना कर्ता वर्तमान क्षणात पूर्ण उपस्थित असतो, त्याच्या शोकाचे रूपांतर कर्मात होते. त्याचे दुःख तिळातिळाने कमी होत जाते. हिंदू अंत्यसंस्कार फक्त मृत व्यक्तीसाठी कधीच नसतात. ते मागे राहिलेल्या शोकमग्न कुटुंबासाठीही तितकेच महत्वाचे असतात. ते शोकाला एक आकार देतात. त्याला व्यक्त होऊ देतात. त्याला आदराने हात जोडतात आणि मग, हळूहळू, शोकाचं रूपांतर संस्कारात करतात.आपले ऋषी मृत्यूला घाबरत नव्हते. त्यांनी मृत्यू समजून घेतला होता. मृत्यूनंतरच्या शोकातून जीवनाकडे कसा प्रवास करायचा ह्याचा नकाशा त्यांनी ह्या कर्मकांडांद्वारे तयार केला होता. पाण्याचा माठ का फोडायचा? पिंड का तयार करायचा? यज्ञोपवीताची दिशा का बदलते? ह्या सगळ्याला उत्तर आहे. शोकाचेही एक व्याकरण आहे जे आपल्या पूर्वसुरींना ठाऊक होते. — शेफाली वैद्य

No comments:

Post a Comment