Thursday, 28 September 2023

#विकिर_प्रकिर_उच्छिष्ट ।१) #विकिर ब्रह्मदेवाने सृष्टि रचली त्या आधी तिच्या अन्नाची व्यवस्था केली , त्यात देवांसाठी सोमभाग योजला ,, म्हणजे सोमाची आहूति हे देवांचे अन्न आहे ।सोम ग्रहण करून देव पुष्ट होतात । पण अश्विनीकुमार हे वैद्य या यज्ञसंस्थेतून वर्जित झाले ,, कारण इंद्रादि देव अश्विनीकुमारांना आपल्या पंक्तीत स्थान देत नसत ।या अश्विनीकुमारांसाठी सर्वप्रथम च्यवन ऋषींनी सोमभाग अर्पण केला,, त्यानंतर श्रौत कर्मात 'सामवेदी बहिष्पवमान' आणि ऋग्वेदी 'आश्विनसाहस्र' या मंत्रांच्या साहाय्याने अश्विनी कुमारांना यज्ञभाग दिला जाऊ लागला ।पण सांप्रत काळात श्रौत कर्म घडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे ।आज सर्वत्र स्मार्त कर्म घडते ।। स्मार्त कर्म म्हणजे ,,,गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या उपचारांनी पूजन अर्चन, यजन याजन,, होम हवन ,, कलश स्थापन , विग्रह पूजा,, श्राद्ध पक्ष... शांती, संस्कार, प्रतिष्ठा, पीडा परिहार,,, इत्यादी सर्व कर्मे हि स्मार्त कर्म आहेत ।यातील श्राद्ध कर्मामध्ये या असोमपा देवांसाठी अन्नाची व्यवस्था पूर्वसुरींनी केली आहे ।असोमपाश्च ये देवाः यज्ञभाग विवर्जिताः ।तेषामन्नं प्रदास्यामि विकिरं वैश्वदेविकम् ।।अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य आहेत । सर्व देवांना मानव आहूति देतो ,, आणि देव मानवांना समृद्धी देतात,, त्यांची पीडा दूर करतात ।देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ।। भगवद्गीता ३-११त्यामुळे जसे आपण देवांचे देणे लागतो तसेच देवांच्या वैद्यांचे सुद्धा देणे लागतो ।असोमपा देवांना ग्रासमात्र देऊन आपण आपलेच कल्याण करतो ।श्राद्ध विधीत पिंडदान झाल्यानंतर उरलेल्या पिंडासाठी कालवलेला जो भात उरतो त्यात तीन भाग काढले जातात,,, त्यात पहिला भाग हा असोमपा देवांसाठी असतो त्याला विकिर म्हणतात ।२) #प्रकिर संस्कार ! म्हणजे नामकरण, मुंज, विवाह इत्यादी न होता गेलेल्या जीवांना 'असंस्कृत' अशी संज्ञा आहे,, कोणत्याही कारणाने एखाद्या स्त्रीचा त्याग केला गेला असेल तर अशा स्त्रियांचे अंत्यकर्म नीट होत नाही ।पूर्वी हा प्रकार खूप घडायचा,, मूल होत नाही म्हणून दुसरा विवाह,, दुसरा विवाह केल्यावर दुसऱ्या पत्नीला जी संतति व्हायची ती सावत्र आईसाठी सर्व क्रिया करेलच याची शाश्वती नसते कुटुंबात जे कुमार कुमारिका लहान वयात जातात ,, ज्यांना दहन केले जात नाही,, पुरले जाते,, यांचे संपूर्ण और्ध्वदेहिक करायचे नसते गर्भस्राव होतो,, गर्भातच बालक मरते ,, (अथवा मुद्दाम मारले जाते) यांचे देखील काही दिवसकार्य होत नाही १)विवाह न होता गेलेली स्त्री, २)परित्यक्ता स्त्री, ३)मुंज/सोडमुंज/विवाह इत्यादी संस्कार न होता गेलेला मुलगा, ४)कुमारावस्थेत गेलेले जीव, ५)गर्भातच मरण पावलेले जीव यांच्या तृप्तीसाठी पिंडातून उरलेल्या भाताचा एक घास काढला जातो ज्याला #प्रकिर म्हणतात ।असंस्कृतप्रमीता ये त्यागिन्यो या कुलास्त्रियः ।ददामि तेभ्यः प्रकिरमन्नं ताभ्यश्च पैतृकम् ।।३) #उच्छिष्ट : व्यवस्था अशी आहे , कि जेव्हा विवाह होतो तेव्हा जे होम केले जातात , त्यातील एक होम आहे गृहप्रवेशनीय होम । हा होम करून मग नवीन दाम्पत्याने गृहप्रवेश करायचा आहे ।आणि दोघेही जिवंत असेपर्यंत त्या अग्नीचे रक्षण करायचे आहे ।आणि सूर्योदय-सूर्यास्त काळी त्या अग्नीत निर्धारित आहुत्या द्यायच्या आहेत ।आणि जेव्हा दोघांपैकी एक कोणीतरी मरण पावेल तेव्हा तो आयुष्यभर रक्षण केलेला अग्नि मातीच्या मडक्यात भरून स्मशानावर घेऊन जायचा ,, आणि त्याच अग्नीवर त्या गृहस्थाचे दहन करावे ,, सांप्रत काळात या पद्धतीचा बहुतांशी लोप झालेला आहे ।गृहप्रवेशनीय होमाच्या अग्नि व्यतिरिक्त अन्य लौकिक अग्नीवर आज आपण मृताचे दहन करतो ।अशा प्रकारे दहन झालेल्या जीवाला 'अनग्निदग्ध' म्हणतात ।ज्या दाम्पत्याने आयुष्यभर अग्नीचे रक्षण केले आहे,, आता दोघांपैकी एक गेल्यावर असलेला अग्नि त्या मृतासोबत स्मशानात गेला,, आता दोघांपैकी जो नंतर जाईल त्याच्या दहनासाठी अन्य गृहस्थाचा गृहयाग्नि मडक्यात घेतला आणि त्याचे दहन केले तर त्या जीवाला 'अग्निदग्ध' असे म्हणतात ।यांचे सर्व और्ध्वदेहिक होते ,, पण आयुष्य भर जी आहूति दिली गेली हवी होती ती न दिली गेल्यामुळे यांच्या तृप्तीत एक न्यूनता असते ।गृहस्थाला प्रतिदिन हवन करणे अनिवार्य आहे । यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ।। भगवद्गीता ३-१३या पितरांच्या तृप्तीतील न्यूनता जावी यासाठी पिंडातून उरलेल्या भाताचा एक भाग काढला जातो त्याला #उच्छिष्ट पिंड असे म्हणतात ।आपल्या आयुष्यामध्ये दृश्यमान आणि अदृश्यमान अशा दोन्ही जगतांचे अस्तित्व असते आणि त्या दोन्ही घटकांचा आपल्यावर दृश्य आणि अदृश्य परिणाम होत असतो ।श्राद्ध संस्थेत या सर्वांचा विचार करून त्यातून आपले हित कसे होईल आणि त्यासाठी आपण त्यांचे कसे करायला हवे याचे विधान आहे ।हे झाले नित्य श्राद्धातील एका अत्यंत छोट्या भागाबद्दल,, तेही संक्षिप्त स्वरूपात ।महालय श्राद्धात अधिक व्यापक विचार आहे ।त्यावर यथावकाश लिहिनच ।सर्वांना तृप्त करणारी श्राद्धसंस्था हि साक्षात कामधेनुच आहे ।सागर सुहास दाबके ।